अमळनेर येथील मच्छी मार्केटचा झाला उकिरडा..
अमळनेर येथील मच्छी मार्केटचा परिसर सध्या अत्यंत अस्वच्छ व उकिरड्यासारखा झाला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मानल्या जाणाऱ्या या मच्छी मार्केटचा आतील तसेच बाहेरील परिसर घाणेरड्या अवस्थेत आहे, त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
अमळनेर येथील या बाजारात मासळी विक्रीसाठी दररोज जिल्ह्याभरातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही व्यापारी येतात. याठिकाणी आणेर डॅम, तामसवाडी धरण, पाडळसरे धरण यांसारख्या मोठ्या जलस्रोतांबरोबरच इतर अनेक लहान मोठ्या तलावांमधून गोड्या पाण्यातील मासळी विक्रीस येते. त्यामुळे या बाजारपेठेचे व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
परंतु या ठिकाणी स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झालेला आहे. मासळी विक्रीनंतर उरलेला कचरा, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. यामुळे तातडीने स्वच्छतेसाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.




