प्रभाग क्रमांक एक आणि दोन ला नगरपालिका मधून वर्ग करून ग्रामपंचायतीचा स्वतंत्र दर्जा मिळावा.. संतप्त रहिवासी नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फळणवीस यांना देणार निवेदन.
अमळनेर नगरपालिका प्रशासनातील प्रभाग क्रमांक एक, म्हणजे साने नगर, न्यू प्लॉट, तांबेपुरा परिसर, हा अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहे. प्रशासनातील कोणीही जबाबदार अधिकारी प्रभाग क्रमांक एक व दोनकडे लक्ष देत नाही. नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्यातील ग्रामपंचायतींना तुलनेने अधिक विकास निधी दिला जातो.
या परिसरात रस्ते, गटारी व पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्या असून, त्यामुळे आरोग्यविषयक समस्याही वाढत आहेत. अनेक वेळा निवेदने व सूचना देऊनही प्रशासक कधीच तांबेपुरा, साने नगर, न्यू प्लॉट परिसरात गेले नाहीत, ही नागरिकांची खंत आहे.
अनेक ओपन प्लेसेसमध्ये काटेरी झुडपे वाढल्यामुळे मच्छर, डास, व सर्पांचा उपद्रव वाढला आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटल्या असून, त्यामुळे गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे डायरिया, पोटदुखी, डोकेदुखी अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
मन्यार शहरातील तसेच विप्रो कंपनीमधून रसायनयुक्त पाणी गटारीत सोडले जाते. ही गटारलाईन मुख्य वस्तीतून जात असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून कायम आहेत. त्यामुळे विप्रो कंपनी प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त जबाबदारीने ही गटार लाईन अंडरग्राउंड करण्यात यावी, ही नागरिकांची गेल्या २० वर्षांपासूनची मागणी आहे, जी अजूनही धुळखात पडून आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, विप्रो कंपनीच्या नवीन प्लांटच्या उद्घाटनासाठी अमळनेर येथे येत आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांकडून समस्यांचे निवेदन दिले जाणार आहे. जर समस्या मार्गी लावल्या गेल्या नाहीत, तर प्रभाग क्रमांक १ व २ ला नगरपालिका प्रशासनातून वगळून स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा किंवा नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे.
पाच लाख लिटर क्षमतेचे दोन जलकुंभ असतानाही पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे पाणीपुरवठा अनेक वेळा विस्कळीत होतो व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
वीज पुरवठ्याचाही प्रश्न गंभीर असून, दिवसातून दोन-तीन वेळा वीज खंडित होते. वायरमन, लाइनमन, अभियंता किंवा उपअभियंता हे वीज पुरवठ्याबाबत उदासीन असून, नागरिकांच्या समस्या त्यांना गंभीर वाटत नाहीत. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विप्रो कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळावी, अशीही नागरिकांची स्पष्ट मागणी आहे.
कदाचित मुख्यमंत्री साहेबांचा ताफा वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
साने नगर, न्यू प्लॉट, तांबेपुरा परिसरातील नागरिक अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत आणि आता स्वतःहून रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे, अशी कुजबुज परिसरात ऐकू येत आहे.


